पतीसह मलाही वैष्णवीच्या नवर्‍याकडून मारहाण   

मयुरी हगवणे यांचा आरोप

पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून वैष्णवी हगवणे प्रकरणाची मोठी चर्चा आहे. आता वैष्णवीची मोठी जाऊ मयुरी हगवणे हिनेदेखील धक्कादायक आरोप केले आहेत.वैष्णवी हिची मोठी जाऊ म्हणजे, शशांकचा मोठा भाऊ सुशीलची पत्नी मयुरीने माध्यमांशी बोलताना वैष्णवी प्रकरणाबाबत अनेक दावे केले आहेत. वैष्णवीचा नवरा शशांक , त्याचे आई-वडील व नणंद हे सगळे पती सुशील व आपल्याला मारहाण करायचे, असा आरोप मयुरीने केला आहे. या मारहाणीमुळे झालेल्या जखमांची छायाचित्रदेखील मयुरीने दाखवली.
 
सासरे राजेंद्र हगवणे यांनीही आपल्यावर हात उचलल्याचा आरोप मयुरीने केला. २०२२ मध्ये माझे सुशील यांच्यासोबत लग्न झाले. पण, माझी नणंद, दीर आणि सासू यांनी माझा कायम छळ केला. सासूने माझे कधी लाड केले तर नणंद त्यांना त्रास द्यायची. माझे पती माझ्या पाठीशी होते; पण, कुटुंबीयांनी माझ्या पतीलादेखील मारहाण केली आहे. त्यांनी त्यांच्या मुलालाही सोडले नाही. माझी नणंद व दिराने माझ्या चारित्र्यावर संशय घेतला. माझ्या सासर्‍यांनी माझ्यावर हात उचलला आहे. आम्ही वेगळे राहायचा प्रयत्न केला; पण तेही त्यांनी होऊ दिले नाही, अशा व्यथा मयुरीने मांडल्या आहेत.
 
कुटुंबीयांकडून होणार्‍या जाचाला कंटाळून आपण माहेरी राहत असल्याचे मयूरीने सांगितले. शिवाय, पती सुशीलनेच आपल्याला माहेरी आणून सोडल्याचेही ती म्हणाली. ५ नोव्हेंबर रोजी मी सासू, सासरे, दीर व नणंद यांची पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर ते फरारी झाले. त्यांनी कधीच मला वैष्णवीशी बोलू दिले नाही, असेही तिने सांगितले.
 
निलेश चव्हाण कोण?
 
वैष्णवीच्या बाळाच्या बाबतीत वारंवार वादात आलेले नाव म्हणजे निलेश चव्हाण याचाही उल्लेख मयुरीने केला. चव्हाण कायम आमच्या घरातील वादात पडलेला आहे. तो शशांकचा मित्र नसून करिश्मा हगवणेचा मित्र आहे. माझे लग्न झाल्यानंतर आमच्या काही बैठका त्याच्या कार्यालयात झाल्या आहेत. माझी नणंद आणि सासू त्याच्या कार्यालयामध्ये या बैठका घ्यायच्या, असा खुलासा मयुरीने केला आहे.
 
त्यांनी स्वत:च्या मुलालाच एवढा त्रास दिला होता, तिथे वैष्णवी काय किंवा मी काय? त्यांचा ते कधीच विचार करणार नाहीत एवढी त्यांची क्रूर वृत्ती आहे. माझा नवरा माझी बाजू घ्यायचा तर शशांक खोलीमध्ये येऊन आम्हा दोघांना मारायचा. माझ्याकडे मारहाणीसंदर्भातील काही छायाचित्र आहेत. यामध्ये जखमेतून रक्त येताना दिसत आहे, असे मयुरी म्हणाली. 
 
ते माझ्या पतीला सांगायचे की तू मयुरीला सोडून दे, आम्ही तुझे दुसरे लग्न लावून देऊ. पण, माझे पती माझ्या बाजूने कायम उभे राहायचे. ते माझ्यासमोर रडायचे. मी त्या घरात एका खोलीमध्ये दीड वर्ष काढले आहे. त्यांनी मला खूप त्रास दिला, असेही यावेळी सांगितले.
 
अजित पवार यांच्याकडून सांत्वन
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैष्णवी हगवणे हिच्या आई-वडिलांना दूरध्वनी करुन त्यांचे सांत्वन केले. तसेच, वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे यांना कठोरात कठोर शासन करु, असे आश्वासन दिले. वैष्णवी मृत्यू प्रकरणात नवनवीन बाबी समोर येत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या पदाधिकार्‍यांकडून कस्पटे कुटुंबीयांची भेट घेण्यात आली. त्यावेळी अजित पवार यांनी दूरध्वनीवरून वैष्णवी हिचे वडील आनंद उर्फ अनिल कस्पटे यांच्याशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. त्यावेळी वैष्णवीच्या आई-वडिलांना अश्रू अनावर झाले.   
 
मी तुमच्यासोबत आहे...
 
आई-वडील मुलीवर आणि मुलावर सारखेच प्रेम करतात. त्यामुळे आई-वडील मुलीच्या लग्नात मोटार, सदनिकासारख्या वस्तू देतात. असे असले तरी, मी तुमच्यासोबत आहे. महिलांच्या न्यायासाठी मी नेहमीच पुढाकार घेत असतो. त्यामुळे मी या प्रकरणात तुमच्या बाजूने आहे, असे अजित पवार यांनी अनिल कस्पटे यांना दूरध्वनीवरून सांगितले.
 
आरोपींना काही तासांत बेड्या : सामंत
 
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वैष्णवीच्या कुटुंबीयांची वाकड येथील निवासस्थनी भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, हा क्रूरतेचा कळस आहे. या प्रकरणात ज्यांचा हात आहे, त्यांना कठोर शिक्षा होईल. तसेच अमूक व्यक्ती एखाद्या पक्षात असली म्हणजे त्या व्यक्तीला काहीही करायचा परवाना मिळत नाही. वैष्णवी प्रकरणात पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे. आरोपांनी शिक्षेपर्यंत नेले पाहिजे. अशी प्रवृत्ती ठेचली पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. या प्रकरणात ज्या दोन व्यक्ती फरारी आहेत, त्यांचा शोध घेण्यासाठी सहा पथके तयार करण्यात आली आहेत. पुढच्या २४ तासांत त्यांना तुरुंगात टाकण्यात पोलिस यशस्वी होतील. दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी आमची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
 
महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनीही वैष्णवी यांच्या आई-वडिलांची भेट घेतली. पोटच्या गोळ्याची कोणीही भरपाई करू शकणार नाही. हे फार वेदनादायी आहे. त्यांच्या लेकीला न्याय देण्यासाठी सरकार म्हणून जे करता येईल ते आम्ही करणार आहे. फरारी आरोपींना शोधण्यासाठी सहा पथके नियुक्त करण्यात आली आहेत. ९ महिन्यांचे बाळ वैष्णवीच्या कुटुंबाकडे सुखरूप आलेले आहे. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर हलगर्जी झाली असेल, तर योग्य ती दक्षता घेण्यात येईल. फरारी आरोपी तुरूंगात गेले पाहिजेत, असे त्या म्हणाल्या. 

Related Articles